Saturday, March 9, 2024

जोहार

आजचा जागतिक महिला दिन भारतीय महिलांसाठी विशेष महिला दिन असतो. या दिवशीच चितोडमधील महिलांनी आपल्या अब्रूरक्षणासाठी पेटत्या कुंडात उड्या घेऊन आत्मसमर्पण केले होते. चितोडमध्ये तीन वेळा जोहार झाले.
यापैकी दुसरा जोहार आठ मार्च रोजी झाला. 

पहिला जोहार १३०३ मध्ये झाला. याची नक्की तारीख माहीत नाही. चितोडचा राजा रतन रावळ सिंग याच्या अधिपत्याखाली असलेल्या चितोडगडावर अल्ला उद्दीन खिलजी याने आक्रमण केले. यावेळी आपल्या अब्रूरक्षणासाठी चितोड किल्ल्यातील राणी पद्मिनी हिने ७०० स्त्रियांसह किल्ल्यातील कुंडामध्ये अग्नी पेटवून त्यात उडी घेतली. रतन रावळ सिंग यांच्यासह किल्ल्यातील सर्व पुरुषांनी लढत हौतात्म्य पत्करले. 

 दुसरा जोहार ८ मार्च १५३५ रोजी झाला. या वेळी हा किल्ला राणा प्रतापची आजी कर्मावती हिच्या ताब्यात होता. गुजरातच्या बहादूर शहाने या किल्ल्यास वेढा घातला. आपला पराभव समोर दिसताच राणी कर्मावतीने किल्ल्यातील स्त्रियांसह जोहार केला. किल्ल्यातील सर्व पुरुषांनी बहादूर शहाच्या सैन्याशी लढत हौतात्म्य पत्करले. चितोडमधील तिसरा जोहार २२ फेब्रुवारी १५६८ रोजी झाला. हा केला त्यावेळी राणा प्रतापचे वडील उदयसिंह यांच्या ताब्यात होता. त्याला अकबराच्या सैन्याने वेढा घातला. परंतु किल्ल्यातील गुप्त मार्गाने उदयसिंह आणि त्यांचे कुटुंबीय निसटले. या किल्ल्याच्या रक्षणासाठी उदयसिंहाने जयमल राठोड आणि पट्टा सिसोदिया यांच्या ताब्यात दिला होता. एके दिवशी सकाळी अकबराच्या सैन्याने जयमल राठोड याला स्फोटकांनी नुकसान झालेल्या किल्ल्याच्या डागडुजीची पाहणी करताना पहिले. त्यांनी त्याला ठार केले. आता किल्ल्याचे रक्षण करणे कठीण आहे हे राजपुतांच्या लक्षात आले. त्या दिवशी रात्री किल्ल्यातील सर्व स्त्रियांनी जोहार केला. दुसऱ्या दिवशी पहाटे किल्ल्यातील सर्व पुरुषानी केसरीया (साका) करून लढत हौतात्म्य पत्करले. 

 सोबतच्या चित्रात चितोड येथील किल्ल्यातील जोहारकुंड आहे. आजही हा पवित्र परिसर दुर्लक्षित आहे. 

 महिला दिनाच्या शुभेच्छा 

 संतोष कारखानीस ठाणे





No comments:

Post a Comment